राज्यभरात अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया   

१५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी दरवर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहणारी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया यंदा १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने ठेवले आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले असून, वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत.
 
या प्रक्रियेतून सुमारे १६ लाख ७६ हजार जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे उपस्थित होते.यापूर्वी ही ऑनलाइन प्रक्रिया फक्त पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रांमध्येच लागू होती. आता ती संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे.
 
प्रवेशासाठी https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांना एका अर्जात राज्यातील कोणत्याही प्रमाणित महाविद्यालयात प्रवेशासाठी पर्याय निवडता येईल. प्रवेश प्रक्रियेचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 
 
तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे प्रत्येक महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहेत. फक्त प्रमाणित महाविद्यालयांनाच प्रवेश अधिकार प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्रमाणित केलेल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाच संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. अनधिकृतरित्या प्रवेश देणार्‍या संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

Related Articles